रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Friday, March 16, 2012

सदानंद रेगे यांची कविता

- विलास सारंग

सदानंद रेग्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, एक वेगळेपण म्हणजे तिच्यातील विमुक्त कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती सगळेच कवी वापरतात. परंतु प्रत्येक चांगला कवी आपल्या कल्पनाशक्तीला एका विशिष्ट, वैयक्तिक मुशीत टाकतो. एक विशिष्ट दृष्टिकोण, एक ‘व्हिजन ऑफ लाईफ’ त्याच्या साऱ्या कवितेतून व्यक्त होते. असे विशिष्ट ‘व्हिजन’ कवीच्या कवितेला एकसंधपणा, ठाशीवपणा देते. (त्यापायी एकसुरीपणा येण्याचाही धोका असतो.) सदानंद रेग्यांनी असे एकात्म ‘व्हिजन’ अंगीकारण्याचे सतत नाकारलेले दिसते. उदाहरणार्थ, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचा विषय. दुसरा एखादा कवी आपल्या विशिष्ट ‘व्हिजन’मधून यावर एखादी कविता लिहील. परंतु रेगे वेगवेगळ्या दृष्टिकोणांतून या एकाच विषयावर पाच-सहा कविता लिहून जातात. कुठल्याही दृष्टिकोणाशी बांधिलकी न मानता शक्य तेवढ्या वेगवेगळ्या ‘अँगल्स’मधून ते विषयाचा वेध घेतात. एकच विषय घेऊन त्यावर अनेक कवितांची मालिका लिहिण्याचा हा प्रकार त्यांनी अनेकदा केलेला आहे. कोणत्याही मनोभूमिकेची बांधिलकी न स्वीकारता त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिले. या अर्थाने त्यांची कविता ‘विशुद्ध’ आहे. एका वेगळ्याच प्रकारची ‘विशुद्ध कविता’ त्यांनी मराठीत निर्माण केली.

यापायी सदानंद रेग्यांची कविता मर्यादितही झाली. श्रेष्ठ कवीच्या कवितेतून जसे एक व्यामिश्र परंतु एकात्म ‘व्हिजन’ प्रतीत होते, आवाहन देत राहते, तसे रेग्यांच्या कवितेबाबत होत नाही. त्यांच्या कवितेत फार विखुरलेपणा राहतो. दिलीप चित्रे, वसंत आबाजी डहाके, गुरुनाथ धुरी यांच्या कवितेले जसा ठाशीव चेहरामोहरा आहे, तसा सदानंद रेग्यांच्या कवितेला नाही. परंतु वर उल्लेखिलेल्या कवींच्या कवितेत बरेचदा जो एकारलेपणा आढळतो तो रेग्यांच्या कवितेत नाही. रेग्यांची कविता नेहमीच वेधक, ‘सरप्रायझिंग’ राहते, वाचकाचे कुतूहल जागृत ठेवते. रेग्यांची पुढील ओळ किंवा पुढली कविता कुठे भरारी (किंवा कोलांटी) मारील ते कधीच सांगता येत नाही.

रेग्यांच्या कवितेचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील सर्वसमावेशक (एक्लेक्टिक) वृत्ती. ही ‘एक्लेक्टिक’ वृत्ती मराठीत मुळातच फारशी आढळत नाही. मर्ढेकर, विंदा करंदीकर यांच्या कवितेत ती दिसून येते, परंतु त्यानंतर ती अधिकच वेगाने लुप्त असल्यासारखे वाटते. ‘भारतीय (हिंदू) संस्कृती’, ‘मराठी परंपरा’, ‘आपली माती’ या घोषणांचा उच्चार अधिकाधिक कर्कश बनतो आहे. बहुतांश मराठी कविता आपल्या छोट्या वर्तुळात तीच-तीच वळणे गिरवीत बसलेली आहे. त्याबाहेर पडण्याची ईर्ष्या अभावानेच आढळते. अशा या वातावरणात सदानंद रेग्यांनी बेदरकार वृत्तीने सर्वत्र संचार केला. विषयांच्या निवडीत कसल्याही कोतेपणाला थारा दिला नाही. त्यांनी ‘चिनी’ कविता लिहिल्या; लाव्त्झूसाठी कविता लिहिल्या; ख्रिस्तावर, लझारसवर कविता लिहिल्या. एडवर्ड मंकसारख्या चित्रकारावर कविता लिहिली, ‘खुदा हाफीज’सारखी ‘इस्लामी’ कविता लिहिली. ‘भारतीय संस्कृती’, ‘आपली माती’ या कल्पनांचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. रेग्यांपाशी एवढी विमुक्त कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी कविवृत्ती असल्यानेच त्यांना हे शक्य झाले.

रेग्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील विनोद आणि ‘आयरनी’. गंभीर कवितेला विनोदाचे वावडे असते अशी गैरसमजूत मराठीत रूढ झाल्याचे दिसते. बहुतांश कविता ही ‘लांब चेहऱ्या’ची कविता आहे. ‘सीरियसनेस्’ म्हणजे ‘सॉलेम्निटी’ नव्हे आणि गंभीर जीवनदृष्टीला ‘कॉमिक व्हिजन’चे वावडे नसते हे फारसे लक्षात घेतले गेल्याचे दिसत नाही. याला दोन ठळक अपवाद म्हणजे अरुण कोलटकर आणि सदानंद रेगे. यांच्या कवितेतील गांभीर्य ‘कॉमिक’ वृत्तीला सामावून घेते. या दृष्टीने गेल्या काही वर्षांतील ‘सत्यकथे’तल्या रेग्यांच्या कविता पाहाव्यात. अलीकडे ‘सत्यकथे’च्या जवळजवळ प्रत्येक अंकात रेग्यांच्या कवितेतील निर्भर, विनोदी वृत्ती आणि अंकातल्या इतर बहुसंख्य कवितांमागील अतिगंभीर वृत्ती यांमधील विरोध मनावर ठसायचा. (१९८०-८२च्या दरम्यान.)

मराठी कवितेच्या कोंदट, कोत्या, ‘इनब्रीडिंग’ने कोळपलेल्या वातावरणात सदानंद रेग्यांची कविता हा एक मोकळा वारा होता. हा वारा आता वाहायचा थांबला आहे.

***
‘अभिरुची’च्या १९८२च्या दिवाळीतील अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. रेगे ८२च्याच ऑक्टोबरमध्ये गेले. 

सारंगांच्या ‘अक्षरांचा श्रम केला’ (मौज प्रकाशन) ह्या पुस्तकात हा लेख (११४-११५) आहे. इथे हा लेख प्रसिद्ध करण्यासाठी सारंगांची फोनवरून परवानगी घेतली आहे. त्यांचे खूप आभार. मुळात लोकांनी मूळ पुस्तक घेऊन सगळं वाचावं.

6 comments:

  1. This is great...I hope one day Marathi reading people will realise worth of the late Shri. Rege...I have a facebook page on him here...http://www.facebook.com/pages/Sadanand-Rege-In-Marathi-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87/211430715581924

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Rege yanni lihilele baalsahitya konaakade milel ka? tyanchi pustake Out of print aahet...

    ReplyDelete
  4. I refer to रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते. त्यामुळे काही वेळा ती दुर्बोधतेची पातळी गाठते. त्यांची कविता जाणीव-नेणीवेच्या वर्तुळांमध्ये सारखी आतबाहेर करत असते. त्यांची प्रतिमा-प्रतीकसृष्टी अद्भुताचे, गुढाचे मिश्रण असलेले, व्यामिश्र आणि बहुस्तरीय आहे.

    I feel this could be written in a simpler way...its complexity does not do justice to Rege...also calling it विक्षिप्त, विदुषकी is not fair presuming both विक्षिप्त, विदुषकी are not 'praise' words in Marathi...I think the best commentary on Rege's poetry has come from Sarang...it's hard to better it as most of Sarang...

    ReplyDelete
  5. I read your reply...I am the last guy to complain about विक्षिप्त, विदुषकी because I like it more than even poetry but when Marathi critics use those words they come with a lot of baggage because most of them don't understand विक्षिप्त, विदुषकी...whatever is not conventional is विक्षिप्त, विदुषकी for most of them...Your blog has covered most sources of info on Rege...I don't know if one can access issues of Rahasya-ranjan...I think Shri Vasant Sarwate has some issues...I think it used to have Rege's contributions...oh yes one more thing...Ramdas Bhatkal's essay in Jigsaw on Rege...his soaking of shev in tea...(i used to soak all kinds of things in coffee myself!)...but I feel Shri. Bhatkal could have done much better...best

    ReplyDelete
  6. My name is BG Limaye from Pune. My hobby is to give calligraphic tribute to Poets who have made our lives more beautiful. Today I tried to give calligraphic tribute to Sadanand Rege's Poem " Dewapudhcha Diwa" through my handwritting on my blog www.calligraphicexpressions.blogspot.com . Please visit the same.. If you like pl inform your email id so that I can share the same to you... thanks for the nice blog..
    Regards
    BG Limaye
    bhalchandra.limaye@kbl.co.in

    ReplyDelete

मित्र