रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Thursday, March 8, 2012

अक्षरगंधर्व

सदानंद रेग्यांच्या स्मृतिदिवशी १९८७साली प्र. श्री. नेरुरकरांनी संपादित केलेलं नि 'पॉप्युलर प्रकाशना'ने प्रकाशित केलेलं 'अक्षरगंधर्व' हे पुस्तक प्रकाशित झालं. रेग्यांची नेरुरकरांनी घेतलेली मोठी मुलाखत. काही पत्रं, डायरीतील काही मजकूर असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि मुखपृष्ठावर दिसतंय ते चित्र रेग्यांनीच काढलेलं.

या पुस्तकातल्या मुलाखतीत रेग्यांनी थोडं त्यांच्या बालपणाबद्दल, नोकऱ्यांमधल्या उमेदवारीबद्दल, नॉर्वेला जाण्याचा नि तिथे असतानाचा अनुभव, साहित्याबद्दलची मतं, काही आजूबाजूची ओळखीची मंडळी, अशा कित्येक गोष्टींबद्दल मारलेल्या गप्पा आहेत. या मुलाखतीतला अगदीच थोडासा मजकूर खाली दिला आहे. या मजकुरावरून एकूण अंदाज कोणी बांधू नये हे तर आहेच कारण ब्लॉग बनवणाऱ्याने त्याच्या डोक्यानुसार हा मजकूर निवडलाय, पण तरी काही एक अंदाज येईल असं वाटल्यामुळे हा मजकूर इथे देत आहे --
***

रेगे- कोणत्याही प्रकारचा समाज. कोणत्याही प्रकारचा समाज जरी घेतला तरी, आमच्या कॉलेजमध्ये एकवीस वर्षे मी काम करतोय. तिथल्या शिक्षकांत किंवा तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये मी समरस होऊ शकलो नाही. कारण असं की तिथं जे प्रकार चालतात ते धादान्त खोटे आणि पोट भरणारे प्रकार आहेत. तिथं कुणीही मनापासून शिकवत नाही. कारण त्या त्या विषयातील शिक्षक... माफ करा. मला हे बोलावं लागतंय... कारण माझा अनुभव... की त्यांना त्या त्या विषयाचा श्रीगणेशासुद्धा माहीत नसतो. फिजिक्सच्या मास्तराला विचारलं की फिजिक्स म्हणजे काय हे पाच मिनिटांत तू मला सांगू शकशील काय? तर तो हसतो आणि खांदे उडवतो. वाङ्मयाच्या प्राध्यापकाला जर म्हटलं की वाङ्मय म्हणजे काय? तर ते त्याला धड सांगता येत नाही. तर अशी ही स्थिती असल्यामुळे त्या शिक्षकावरही विश्वास नाही. ते हे जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना अर्थातच त्यामुळे विषयातलं मूलगामी ज्ञान कधीच मिळत नाही, चार वर्षांत आणि सहा वर्षांमध्ये... तेव्हा फक्त आम्ही स्टॅम्प लावून त्यांना डिग्र्या देतो. याच्या पलीकडे काही नाही. त्या समाजातही मी मिसळू शकलो नाही. साहित्यिकांच्या समाजातही मी मिसळू शकलो नाही. तर तिथे हाच प्रकार मला आढळला की वेगवेगळ्या प्रकारच्या गँग्स तयार करणं. वेगवेगळ्या प्रकारची रॅकेट्स तयार करणं.
नेरूरकर- लॉबी.
रेगे- लॉबीज्.. या तयार करणं. कारण तुम्ही बघा की दोन-दोन तीन-तीन वर्षांनी तुमचे साहित्यिक... (हसून) साहित्यिकांचे देवत्व पावणारे जे साहित्यिक आहेत, ते बदलत गेलेले आहेत. जर तुमचा एखादा चांगला साहित्यिक असेल तर तो कायमचा चांगला साहित्यिक का राहात नाही? तर दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी तुमची दैवतं का बदलतात? हा एक प्रश्न आहे. त्याचं सरळ उत्तर असं आहे की रॅकेट्स आहेत. तर या रॅकेट्सचासुद्धा कधी मी भाग होऊ शकलो नाही. कारण त्यातला जो व्यवहार व धूर्तपणा आहे तो माझ्या मनाला परवडण्यासारखा नाहीय. मी असं म्हणत नाही की मी मोठा सच्चा किंवा मीच त्यातला खरा असं म्हणत नाहीय पण माझ्या स्वभावाच्या मर्यादा तुम्हाला सांगितल्या.
---

रेगे- कारण एकच शब्द घेऊन त्याचे अनेक अर्थ लावून किंवा अनेक अर्थ न लावून.. प्रत्येक शब्द हा... क्षेत्राक्षेत्राकडे त्याचा अर्थ बदलतो... मनुष्य म्हणून माझ्या भोवती समाज आहे. या समाजात मी जन्माला आलो आहे. मी अगदी रानात गेलो तरी हा समाज विसरू शकत नाही. रानात गेलो तरी जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्या मी घेऊन जाणारच. मी समाज नेणारच. समाजाला कोणता मनुष्य टाळू शकत नाही. कारण मनुष्य हा समाजातलाच प्राणी आहे. तो समाजाचा असतोही आणि नसतोही. हो की नाही?

... तर आता माझी बांधिलकी जी समाजाची आहे ती मी टाळू शकत नाही. पण ती कोणत्या प्रकारची आहे? माझे नातलग आहेत. आईला मी आई म्हणावं, बापाला मी बाप म्हणावं. आपुलकी आहे ती कुणी माझ्या शिरावर ठेवलेली नाही. किंवा ममाझे भाऊ आहेत. माझे नातलग आहेत. मित्र आहेत. माझे शेजारी आहेत. माझं गाव आहे. माझ्या भोवतीचा समाज आहे. ही जाणीव ठेवून मी आहे. आणि त्या समाजाशी कृतज्ञता... त्याने माझ्यासाठी जे केलं आहे, ते मनात ठेवणं आणि जे करता येईल तेवढं करणं हे मी मानतो- न मानलं तरी मला त्याच्यापासून टाळता येणार नाही. असं आहे, मी एक कलावंत म्हणून काही समाजाचा घटक नाहीय. मी समाजापेक्षा थोडा वेगळा आहे. कारणी मी विशेष मनुष्य आहे- कलावंत म्हणून. तर कलावंत म्हणून माझं जे काम आहे... माझं काम... समजा, मी लेखक आहे... शब्द हे माझं माध्यम आहे, शब्द हे माझं साधन आहे. जे जे काही मला व्यक्त करायचं... आता इथेसुद्ध लोक घोटाळा करतात... व्यक्त करणं, कम्युनिकेट करणं यांचा आपण अनेक प्रकारे अर्थ लावतो. समजा, मी माझ्या गावातल्या एका नातेवाईकाला पत्र लिहिलं : ‘इथं असं असं जीवन आहे, तिथं कसं काय आहे? तुझी शेतीवाडी वगैरे माहिती...’ माझी माहिती मी पुरवतो. हे एक प्रकारचं कम्युनिकेशन झालं. म्हणजे इन्फर्मेशन... विचार... ज्ञान... हे कम्युनिकेशन. पण समजा, मी एक फुलाचं चित्र काढलं... त्या वेळेला मी काय कम्युनिकेट करीत असतो? तर ज्या अर्थी मी पत्र लिहितो त्या अर्थी मी कम्युनिकेट काही करत नाही. कुणाला काही सांगायचंय म्हणून मी फुलाचं चित्र काढलंय असंही काही नसतं. तर तो जो कागत आहे किंवा कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासवर मला उपलब्ध असलेली जी लिमिटलेस स्पेस आहे त्याच स्पेसमध्ये... म्हणजे शून्य जे माझ्यासमोर आहे, त्या शून्यामध्ये मी माझ्या माध्यमाद्वारे- शब्द- मला जे काही कागद उपलब्ध आहेत, त्या कागदामध्ये एक पॅरॅग्राफ मी लिहितो. हे शब्द मी त्या चौकटीत आणतो. शब्दांची विशिष्ट प्रकारे रचना करतो. चित्रकार हा भौमितिकक आकार, रंगांच्या पोती... या सगळ्या एकत्र आणून आकार निर्माण करतो. तो अॅबस्ट्रॅक्ट असेल. तो सघन असेल. काँक्रीट असेल... ते सोडून द्या. माझ्या कौशल्याच्या प्रमाणात ते मी करू शकेन. कौशल्याच्या पलीकडे जाऊन मी ते करू शकेन. कलावंत म्हणून माझं काम काय, तर माझ्या माध्यमाशी मी प्रामाणिक असणं, आणि शक्य तर त्या माध्यमाच्या ज्या काही पारंपरिक मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करणं. हे माझं कलावंत म्हणून काम आहे. कुणाला काही सांगायचं आहे म्हणून मी लिहीत नाही. सांगायचं असेल तर मी सरळ सांगेन की, हा समाज बदलला पाहिजे. जातिवाद नष्ट झाला पाहिजे. ब्राह्मण किंवा उच्चभ्रू लोकांनी खालच्या दलितवर्गामध्ये मिसळलं पाहिजे. हे करायलाच पाहिजे. याच्याशिवाय गत्यंतर नाहीच आहे. पण हे सांगण्यासाठी काही मी गोष्ट लिहिणार नाही... सांगायचं असेल तर. वातावरणात जर मी सहजता गेलो. तिथे मला काही नवीन... दुसरं म्हणजे अनुभवाच्या बाबतीतसुद्धा... कोणताही लेखक कोणताही अनुभव नवीन सांगू शकत नाही. कारण नवीन अनुभव असा असूच शकत नाही. कारण जशी इतरांना शरीराच्या, मनाच्या मर्यादा असतात तशा कलावंतालाही असतात. आणि इतर लोक जे अनुभव घेतात तेच कलावंत घेत असतो. पण तो नवीन का होतो? हा अनुभव नवीन ठरू शकतो, कारण त्यात वापरलेले शब्द, त्यांची अभिव्यक्ती, ही त्या अनुभवाला नवीन करते..

सदानंद रेगे

No comments:

Post a Comment

मित्र